Sunday, September 25, 2011

६, ४, आणि मी

६, ४, आणि मी

पहिल्या ’ट्याहां’ पासून
आपल्या साथीला जुंपलेले
पाचवीला पुजलेले
ते सहा बेपर्वा….
आयुष्यभर आपल्याला चिकटलेले,
पायात पाय घालून पाडणारे….
…. कसेही असले ते तरी,
त्यांच्यासकटच गाठावे लागतात
ते चार टप्पे….
…..परिपूर्ण आयुष्य,
सर्वार्थाने जगण्यासाठी.
………………………………….
अंतिम टप्प्याचा निर्णय,
अंतिम श्वासानंतर……
..... चित्रगुप्ताच्या कॉंप्युटरमधल्या व्हायरसमुळे
जर Accidentally प्राप्त झाला तो अंतिम टप्पा;
तर ....... त्याच क्षणी लोटांगण घालून
विनवेन देवाला....
"नको देवा.... नकोय मला मुक्ती…..
तिथे नको पाठवू रे !.....
…..असेल तिथे निरामय आनंद
नसतीलही चिंता, क्लेश, दु:ख….
पण आहे का रे तिथे तो संघर्ष ?
आहे का तो थरार ?
एकट्यानेच सहांशी झुंजण्यातला
..... नाही ना ?
म्हणूनच देवा, कृपा कर
आणि पुन्हा एकदा,
आशा, आकांक्षा, इच्छा, अपेक्षा, उत्कंठा
हा सारा गोतावळा सांभाळत
त्याच सहांशी जिकिरीचं युद्ध लढण्यासाठी,
त्यातलं नाट्य अनुभवण्यासाठी,
पुन्हा त्याच मनस्वी धडपडीसाठी,
देवा,
मला Recycle Bin मध्येच टाक कसा."

.... उल्हास भिडॆ (१८-६-२०११)

2 comments: