Sunday, November 14, 2010

चिरंतन सत्य

चिरंतन सत्य

मर्तिकाच्या सामानाचं दुकान
सुतकी चेहर्‍याचं गिर्‍हाईक
दुकानदाराचा निर्विकार चेहरा,
सकाळीच बोहनी झाली म्हणून
पैसे घेताना खुलला
श्रद्धेनं पैसे कपाळाला लावून
पेटीत ठेवतांना
काहीतरी पुटपुटला .....
कदाचित्
“धंद्यात बरकत दे रे देवा”
किंवा, असंच काहीतरी.
............
याच्या धंद्यात बरकत म्हणजे,
कुणीतरी मरायला हवं .....
तिथे चिता जळणार,
याच्या घरात चूल पेटणार,
उदराग्नी शांत होणार.
याचं जीवन,
दुसर्‍याच्या मरणाधीन
अर्थशास्त्र,
दुसर्‍याच्या जीवावर बेतलेलं
...........
एकीकडे खड्डा,
दुसरीकडे मातीचा ढीग,
लयातून उत्पत्ती ....
उत्पत्ती, स्थिती, लयाच्या लयीत
गरगरणारं विचारचक्र ....
त्या मंथनातून,
पुनश्च गवसलेलं
शाश्वत, चिरंतन सत्य ......
’जीवो जीवस्य जीवनम्”
(माणसां-माणसांत देखील)
..... उल्हास भिडे (१५-११-२०१०)

Thursday, November 11, 2010

आज अचानक

आज अचानक

आज अचानक असे लाभला या गीताला सूर
आज अचानक कसा पालटे नियतीचाही नूर

गमे अचानक आज संपली हृदयातिल हुरहूर
किती दिसांनी शांत जाहले मनातले काहूर

गूज मनीचे तिज सांगाया आजवरी आतूर
प्रतिसादाच्या सुप्त भीतिने सदैव चिंतातूर

हृदयी वन्ही तरी न पसरे कधि शब्दांचा धूर
उतावीळ कंठाला ताकिद संयम, धीर, सबूर

आज अचानक तोडुन बंधन झाला कंठ फितूर
सुप्त गूज-बीजाला अवचित फुटले शब्दांकूर

सुन्न जाहलो, पुनश्च काहुर, सूर न हो बेसूर
मन वांछित प्रतिसादे काहुर ठरले क्षणभंगूर

“हो” म्हणतांना प्रिया जाहली सलज्जभावे चूर
स्वीकाराचे शब्द, शब्द ना रुणझुणला संतूर

क्षणी त्याच मज स्वर्ग भासला दोन अंगुळे दूर
हर्ष उसळला असा जणू की नाचे धुंद मयूर

प्रीतीगीता आज लाभले ताल नाद लय सूर
उभय अंतरी प्रीतचांदणे उजळे शुभ्र टिपूर

..... उल्हास भिडे (८-१०-२०१०)

Friday, October 29, 2010

अशी दिवाळी येइल का ?

अशी दिवाळी येइल का ?

दीप उजळले दारोदारी मने मात्र बुडली अंधारी
तिमिरहारिणी तेजदायिनी अशी दिवाळी येइल का ?

मनामनातुन दीप उजळती विश्वासाचे सौहार्दाचे
वैविध्यातुन एकत्वाचे स्वप्न खरे ते होइल का ?

स्वार्थ, विकारां मात देउनी भ्रष्ट-राक्षसा खडे चारुनी
समाजपुरुषा जागविण्याचे, पडघम कानी पडतिल का ?

रंगांतुन संगती साधुनी, एकत्वाच्या कुंचल्यातुनी
रांगोळीसम मंगलमय ते चित्र कुणितरी रेखिल का ?

अशी दिवाळी खरीच यावी, याची डोळां मला दिसावी
परमेशा ही आस मनीची, सांग पुरी तू करशिल का ?

..... उल्हास भिडे (३०-१०-२०१०)

Monday, October 25, 2010

विटंबना

विटंबना

अचानक एक दिवस,
कोणीतरी उठतो,
कुठल्याशा पुतळ्याची,
विटंबना करून जातो …..
..... गदारोळ उठतो ……
मग सुरू होतात,
समर्थक आणि विरोधकांमध्ये
हाणामार्‍या…..
उसळतात दंगली….
आणि नकळतच होते
आपसातल्या सौहार्दाचीच विटंबना
पुतळा,
निश्चल, निर्विकार
की खिन्न आणि असहाय्य ???
………..
विटंबना करणारा मात्र,
मजेत असतो,
शांतपणे दुरून गंमत पहात …….
कदाचित,
पुढच्या अशाच एखाद्या कार्यक्रमाचं planning करत.

...... उल्हास भिडे (२०-१०-२०१०)

Friday, October 8, 2010

साकडं

साकडं

काढून ठेवलेल्या चपलांबरोबर
विकारांची वस्त्र
तात्पुरती का होईना,
देवळाबाहेर उतरवून …..
तुझे भक्त
जेव्हा तुझ्या मूर्तीच्या दर्शनात
मग्न असतात,
तेव्हा .... हळूच देवळाबाहेर येऊन
गोकुळचा कान्हा होऊन
ने चोरून
ती सारी वस्त्रं
आणि कर अग्नीच्या हवाली….
…….मग बघ,
दिसू लागशील त्यांना तू
देवळात
आणि देवळाबाहेरही.
देवा ! .....
..... करशील का रे एवढं माझ्यासाठी ?

….. उल्हास भिडे (८-१०-२०१०)

Wednesday, September 15, 2010

पहिले चुंबन

पहिले चुंबन

अधीरतेने आज गायिले, थरथरणार्‍या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने

सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता

या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले

....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)

Friday, September 10, 2010

जीवन सामान्याचे

जीवन सामान्याचे

अर्थहीन हे भासे मजला जीवन सामान्याचे
मनात काहुर काय प्रयोजन माझ्या अस्तित्वाचे

या असल्या वांझोट्या चिंता मेंदू कुरतडती
विचारांति त्या फोलच ठरती बघता अवती भवती

अगणित नगण्य अणु रेणू हे विश्वाचा आधार
पेशी पेशी मिळून देती जीवाला आकार

संगणकाचे Bit अन् Byte महाजाल निर्मिती
Mega Giga Tera Peta, Byteमधून फुलती

समान्यांतुन समाज घडतो असामान्य जाणिती
सामान्यां सन्मान्य मानुनी जीवन वेचीती

गोवर्धन उचलला हरीने सामान्यांसाठी
स्वराज्य तोरण शिवे बांधिले सामान्यांसाठी

क्रांतिवीर बलिवेदी चढले सामान्यांसाठी
सीमेवरती खडा पहारा सामान्यांसाठी

कलावंतही रसिकजनांना माय-बाप मानिती
भगवंताची भूक असे रे भक्तांची भक्ती

कळस राउळी सोन्याचा परि पाया पाषाणाचा
अदृश्य अशा आदेशे निश्चित हेतू अस्तित्वाचा

सामान्यांचे महत्त्व जगती सामान्यें जाणावे
सामान्य म्हणूनी कधी स्वत:ला उगा न हिणवावे

आयुष्या वरदान मानुनी जीवन घडवावे
कविश्रेष्ठांसम “जगण्यावरती शतदा प्रेम करावे”

...... उल्हास भिडे (१०-९-२०१०)

Friday, September 3, 2010

मी काय म्हणू ?

मी काय म्हणू ?

गोकुळाष्टमीच्या हंड्या फुटल्या ....

आता नव्या उत्सवाची धामधूम सुरू होणार

कुणी श्रद्धेनं, कुणी जबाबदारी म्हणून,

तर कुणी अंगात उत्सवाच वारं संचार म्हणून...

सगळेच जोरदार तयारीला लागणार

............................................................................

मी देखील,

तुमच्यावरच्या प्रेमानं, सवयीनं

आणि आश्वासनं पाळायची खोड असल्यानं

ठरल्या दिवशी हजर होणार

विघ्नहर्त्यासाठी Z secutity !!! या विरोधाभासाने खिन्न होणार

पेपरात माझे फोटो झळकणार

मूर्ती, रोषणाई, उधळपट्टी यावर चर्चा रंगणार

News Channel वाले मला celebrity बनवणार

…………………………………………………..

भटजींच मोबाईलकडे आणि

यजमानांच आरत्या उरकण्याकडेच जास्त लक्ष असणार

भक्तीभाव अभावानेच आढळणार

बाजारभाव मात्र भडकणार

दाम दुप्पट किंमतीच्या दुर्वा, फुलं मला टोचत राहणार

एखाद फूल पडल तर .

कौल दिला अशी अंधश्रद्धा बोकाळायला नको

याच केवळ चिंतेने, मी दुर्वा-फुलांचा भार वाहणार ..

या वर्षी माझा उंदीरही,

ऑक्टोपस आणि मगरीनंतर

त्याचा नंबर लागेल की काय या tension मध्ये असणार

……………………………………………….

मंडपात गर्दी उसळणार

बहुतेक सगळे मागायलाच येणार

देणारा कोणी येतोय का, याची मी वाट पाहणार

रोषणाईच्या झगमगाटात आशेचा किरण शोधणार

समाजात मला शोधणार्‍याचा शोध घेत, माझी नजर भिरभिरणार

चुकून तसा दिसला कोणी,

तर त्याच्या दर्शनाने मी सुखावणार

………………………………………………

नाहीतर एकूण, आनंदी आनंदच असणार

भक्तांच्या अपराधांनी फुगलेल्या पोटात मोदकाला जागा नसणार

म्हणून मोदक तसाच हातात धरून ठेवणार

आणि "आता पुरे" म्हणून सांगण्यासाठी उजवा हात उचललणार .

तर..... तुम्ही त्याला वर किंवा आशिर्वाद समजणार

कर्म माझं अस म्हणून

तोच हात कपाळावर मारून घ्यावासा वाटणार

……………………………………………………………

इतक्यात ……

खांबावरच्या फोटोतल्या, त्या पुणेरी पगडी शी नजरानजर होणार

सत्तांधांचा थरकाप उडविणारी त्याची जहाल नजर

नैराश्याने मवाळ झाल्यासारखी भासणार ..

"काय रे देवा ...." सद्गद स्वरात तो म्हणणार,

"कुठल्या मिशाने हे सुरू केलं मी .

आणि आता,

केवळ उत्सवाचा उत्साह,

इतकच आमीष उरलय ?

हे सारं कधी बदलणार ?

की असंच सुरू राहणार ?

..... काय रे देवा ..... "

मी तरी यावर काय बोलणार ?

दरवर्षी सारखच, थातुर मातूर उत्तर देणार .

बाळा, लोकांना हेच जर मान्य असेल

तर आपण तरी काय करणार ?

माणूस होतास म्हणून,

काय रे देवा

अस तरी म्हणू शकतोस …….

……. मी काय म्हणू ???.......???

--------- उल्हास रामचंद्र भिडे (३-९-२०१०)



Friday, April 9, 2010